मुंबई | Mumbai
मुंबईतील आझाद मैदानात (Aazad Maidan) ओबीसी प्रवर्गातून (OBC Category) आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आरक्षणाकरिता लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज (रविवारी) त्यांच्या उपोषणाचा (Fasting) तिसरा दिवस असून, त्यांनी पत्रकार परिषदेत उद्यापासून पाणी घेणं बंद करत कडक उपोषण करणार असल्याची घोषणा केली. यावेळी जरांगे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरही टीका केली.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “राज्यातील समाजाचं म्हणणे आहे राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ चांगले असून, ब्रँड चांगला आहे. मात्र, राज ठाकरे हे विनाकारण मराठ्यांच्या मध्ये पडत आहेत. राज यांचे ११ ते १३ आमदार निवडून दिले होते परंतु, ते पळून गेले. फडणवीसांनी लोकसभेला (Loksabha) तुमचा गेम केला. विधानसभेला तुमच्या मुलाला त्यांनीच पाडलं. तरी आम्ही विचारलं का. राज ठाकरे हे कुचक्या कानाचे असून, मानाला भुकलेलं पोरगं आहे. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेले, मग पक्ष बरबाद झाला तरी चालंत”, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, काल (शनिवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना राज ठाकरेंना जरांगेंच्या उपोषणासह मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देतांना राज ठाकरे यांनी “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल केला होता. यावरून मनोज जरांगेंनी आज राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.
चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, नाहीतर गेमच वाजवीन
मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर बोलतांना जरांगे यांनी पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांना काही समजत नाही. त्यांनी शांत रहावे, मराठ्यांच्या शिव्या खावू नये. समाजाबद्दल चुकीचे बोलले तर त्यांचा गेमच वाजवीन, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तसेच ओबीसी आहोत ओबीसीतून आरक्षण द्या, नाहीतर ओबीसीमधून आरक्षण देण्यास मी खंबीर आहे”, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.




