मुंबई | Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मागील पाच दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांनी आझाद मैदान रिकामं करावं, अशी नोटीस त्यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर काल (सोमवारी) सुनावणी झाली असता न्यायालयाने जरांगेंना चांगलेच सुनावले होते.
त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी तीन वाजेपर्यंत राज्य सरकारला आझाद मैदान (Azad maidan) खाली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आझाद मैदान खाली न केल्यास आम्ही स्वत: जाऊन पाहणी करणार असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
तसेच मुंबई शहर आम्हाला सामान्य हवे आहे. जर दोन वाजून ४० मिनिटापर्यंत आझाद मैदान खाली झाले नाही तर आम्ही कोर्टाचा अवमान झाला म्हणून कारवाई करू शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय जे सुरु आहे ते बेकायदेशीर असल्याचेही न्यायालय (Court) म्हणाले. आजच्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मनोज जरांगे यांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने मराठा आंदोलकांच्या कृतीबद्दल माफी मागितली. मराठा आंदोलकांची मुंबईत व्यवस्था न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली, असे त्यांनी म्हटले. मात्र, यानंतरही न्यायालयाने मराठा आंदोलकांना दिलासा देण्यास नकार दिला.
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना यासंदर्भात काल न्यायालयात सुनावणी झाली होती. यानंतर न्यायालयाने दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते मोकळे करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज सकाळीच राज्य सरकारने आझाद मैदान मोकळे करण्याच्या सूचना आंदोलकांना दिल्या. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलकांनी आज मुंबईतील रस्ते मोकळे केले. या घडामोडी घडत असतानाच आज पुन्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.





