नाशिक। प्रतिनिधी Nashik
८ ऑगस्ट रोजी रात्री वडनेर दुमाला येथे तीन वर्षाच्या आयुष भगतचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तेव्हापासून वन विभागाने १५ पिंजऱ्यांसह १० पेक्षा जास्त ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, बारा दिवसानंतरही बिबट्या कैद न झाल्याने पहिल्यांदाच बिबट्या-मानव संघर्षानंतर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांसह नागरिकांचा आक्रोश मोर्चा निघाला. बुधवारी (दि. २०) दुपारी अडीच वाजता उंटवाडीतील नाशिक पश्चिम वन विभागाच्या कार्यालयात आठशे ते एक हजार जणांचा मोर्चा धडकला.
मोर्चेकऱ्यांनी वन विभागाच्या कार्यालयात घोषणाबाजी करुन निषेधाचे फलक उंचावले. त्यावेळी नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी सात दिवसांत बिबट्या जेरबंद करण्याची ग्वाही वन विभागाने दिली.




