मुंबई | Mumbai
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवासात एक मोठा वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची दाट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याकडून येत्या काही तासांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्या आधी बच्चू कडू यांना त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करायला सांगावी, अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते.
उदय सामंतांसोबत बैठकीत खलबतं
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांना विधान परिषदेवर संधी द्यायची असेल, तर त्यांना आपला ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ अधिकृतपणे शिवसेनेत विलीन करावा लागेल, अशी अट घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये या राजकीय समीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
Bollywood News : दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बुधवारी भुमिका स्पष्ट करणार
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने बैठकांचा सपाटा लावला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा अशी मागणी शिवसेनेतील काही नेत्यांनी केली आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने ही मोठी अट घातली आहे. त्यामुळे बच्चू कडू उद्या बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.
कार्यकर्त्यांना मेसेज
एकनाथ शिंदे यांच्या ऑफरनंतर बच्चू कडू यांनी राज्यभरातील प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोबाईल एसएमएस द्वारे त्यांचे मत विचारले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांनी काही प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा केली होती. यावर अनेक कार्यकर्त्यांनी “भाऊ, तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य आहे,” असे उत्तर दिल्याचे समजते.
बच्चू कडूंची मागणी
बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानेही शिवसेनेकडे काही भूमिका मांडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बच्चू कडू यांना विधानपरिषदेसह राज्यात मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना सांगितली आहे.
विदर्भात शिवसेनेची ताकद वाढणार
बच्चू कडू स्वत: 2004, 2009, 2014 आणि 2019 ते अचलपूर मतदारसंघातून अपक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. विदर्भ आणि अमरावती पट्ट्यात प्रहार संघटनेचे जाळे आणि बच्चू कडू यांची वैयक्तिक ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे बच्चू कडू प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करुन एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर शिवसेनेची विदर्भातील ताकद वाढेल. याशिवाय, बच्चू कडू यांची दिव्यांग, सामान्यांचे प्रश्न घेऊन लढण्याची आणि लोकांमध्ये मिसळण्याची राजकारणाची पद्धत ही एकनाथ शिंदे यांच्याशी मिळतीजुळती आहे. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेता बच्चू कडू यांच्या रुपाने विदर्भात शिवसेनेला आक्रमक आणि लोकप्रिय नेता लाभेल. प्रहार पक्षाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये काय निर्णय होतो, हे पाहावे लागणार आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका साऱ्यांचे लक्ष लागले आहे.





