मुंबई । Mumbai
७० आणि ८० च्या दशकात आपल्या भारदस्त अभिनयाने आणि अष्टपैलू भूमिकांनी रुपेरी पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सायन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हिंदी सिनेसृष्टीतील एका अनुभवी पर्वाचा अंत झाला असून, कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत कपूर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’मुळे (अनेक अवयव निकामी झाल्याने) त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त अभिनेते अवतार गिल यांनी माध्यमांना दिले. काल संध्याकाळी ६:३० वाजता अत्यंत मोजक्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
भरत कपूर यांनी १९७० ते ९० या दोन दशकांत हिंदी चित्रपटांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. कधी दरारा निर्माण करणारा खलनायक, तर कधी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा सहाय्यक अभिनेता, अशा दोन्ही छटा त्यांनी लिलया पेलल्या. ‘नुरी’, ‘बाजार’ आणि ‘गुलामी’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले होते.
त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांची माळ आहे. यात प्रामुख्याने राम बलराम, लव्ह स्टोरी, आखरी रास्ता, स्वर्ग, खुदागवा, सत्यमेव जयते, साजन चले ससुराल यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. २०११ नंतर वाढत्या वयामुळे ते अभिनयापासून दूर होते, मात्र त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
भरत कपूर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “एक संयमी आणि शिस्तबद्ध अभिनेता हरपला,” अशा भावना सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहेत. साधी राहणी आणि अभिनयावर असलेली नितांत श्रद्धा हेच त्यांच्या यशाचे गमक होते.





