मुंबई | Mumbai
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काल (मंगळवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. यावेळी भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. मात्र, त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलतांना तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी राऊतांनी ‘एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते’, असे म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केला. संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत असून यात भाजपने देखील उडी घेतली आहे. राज्याचे महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ‘शरद पवारांवर टीका करण्याची उंची संजय राऊतांची आहे का’, असे म्हणत त्यांना खोचक टोला लगावला आहे. मुंबईत (Mumbai) झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.
यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती संजय राऊतांना समजलेली नाही. एखाद्या पुरस्काराची निवड करणे आणि सत्कार करणे ही संस्कृती आहे. संजय राऊत हे शरद पवार यांना सल्ले द्यायला लागले आहेत. पण शरद पवार हे सल्ला घेतील का? राऊत का चिडचिड करत आहे माहिती नाही. संजय राऊतांची उंचीच नाही. त्यांनी एक तरी निवडणूक लढवली आहे का? असा सवाल करताना संजय राऊतांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी. अमित शहांनी ११ निवडणुका लढविल्या आहेत, प्रत्येक निवडणुका ते जिंकले आहेत”, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
पुढे ते म्हणाले की,” संजय राऊत पवार साहेबांना एकट्यात भेटले नसतील. पवारसाहेब त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजावतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापेक्षा नक्कीच एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं, याचं सर्टिफिकेट शरद पवार देत आहेत, हे त्यांना पटत नसेल. मी शरद पवार यांचे अभिनंदन करतो, त्यांनी योग्य निवड केली. उद्धव ठाकरे दोनच दिवस मंत्रालयात आले, मात्र एकनाथ शिंदे सलग काम करत होते. शरद पवार यांना देखील वाटतं की शिंदे उत्कृष्ट मंत्री आहेत. मात्र, पवार साहेबांना उशिरा कळलं”, असेही मंत्री बावनकुळे यांनी म्हटले.