मुंबई | Mumbai
आखाती देशातील युद्धाचे तीव्र परिणाम हे संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे. भारतातही या युद्धाचे परिणाम पाहायला मिळत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. महाराष्ट्रात अद्यापही अनेक जिल्ह्यांत सिलिंडरसाठी लोकांची गॅस सिलिंडर कार्यालयाबाहेर गर्दी बघायला मिळत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यात इंधनाची कोणतीच कमतरता नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचबाबतची सविस्तर माहिती आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. इंधन तुटवड्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे भुजबळांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
पुरेसा सिलेंडरा साठा शिल्लक
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. 30 मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारकडे सध्या सिलेंडरचा पुरेसा साठा शिल्लक आहे. परंतु भारत सरकारच्या निर्देशान्वये आपण पीएनजीचे (पाईप नॅचरल गॅस) वेगात काम सुरू केले असून येत्या तीन महिन्यात शक्य तिथे पीएनजी जोडणीवर भर देणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. शक्य असूनही पीएनजी गॅस घेतला नाही तर LPG बंद होऊ शकतो असा उघड इशाराच भुजबळ यांनी दिला आहे.
मोठी बातमी! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, नेमका काय आहे?
पीएनजी कनेक्शनसाठी लवकरात लवकर अर्ज करा
पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरी भागांमध्ये नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे गरजेचे असणार आहे. जर पीएनजी लाईनचे काम पूर्ण झाले आणि अर्ज केला नसेल, तर तीन महिन्यानंतर LPG बंद होऊ शकतो. मात्र, ज्यांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे आणि तरीही पीएनजी लाईन बसवली गेली नाही, त्यांचा LPG सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा नियम फक्त ज्या शहरांमध्ये पीएनजीचे काम सुरू आहे तिथेच लागू असेल, संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले. पीएनजीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे यासाठी महानगरची निवड करण्यात आली आहे. ज्या लोकांना गॅस लाइन कशी घ्यावी? कुठे अर्ज करावा? हे कळत नसेल तर त्यांनी यासाठी रेशन चालकांकडे यासाठी अर्ज करावा, मग ते अर्ज पुढे पाठवतील, अशी माहिती सुद्धा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
Nitish Kumar : नितीश कुमार यांचा आमदारकीचा राजीनामा, मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम
पुरेसे अन्न धान्य
अन्न धान्य पुरेसे आहे. रेशनिंगवरचे अन्न धान्य तुम्ही ३ महिन्याचे घ्यावे, असे मी सुचित करतो. साठवणुकीसाठी जागा कमी पडत असल्यामुळे तीन महिन्यांचे धान्य एकत्रित नेले तरी काही अडचण नाही असे भुजबळांनी म्हटलं. आताच्या परिस्थितीत आपण जो केरोसीनचा कोटा देत आहोत. ज्यांना केरोसीन हवे आहे त्यांनी तो घ्यावा, असेही भुजबळ यांनी सांगितले.
व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ
व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच LPG साठ्यातही मोठी वाढ करण्यात आली असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.





