लोणी |वार्ताहर| Loni
भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणार्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर शब्दही कधी काढला नाही. अडीच वर्षांची सत्ता भोगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले 16 टक्के आरक्षण घालविण्याचे महापापही केले. त्यांनी महायुती सरकारने काढलेल्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
मंत्री विखे पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रवरानगर येथे नागरिकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून बजावलेल्या यशस्वी भूमिकेबद्दल जिल्हा तसेच राज्यातून आलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. जनता दरबारात नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांनी अधिकार्यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासन आदेशावर केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. गेली अनेक वर्षे तेही सत्तेत होते. मंत्री पदही त्यांनी भोगले आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात कधीही पुढाकार घेतल्याचे दिसले नाही. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात, त्या शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे वक्तव्य करून समाजाच्या तोंडाला पाणपुसली याचा सोयीस्कर विसर थोरातांना पडला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारमध्ये सुध्दा मंत्री राहिलेले आणि त्यानंतर स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणारे बाळासाहेब थोरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात शब्दही काढताना दिसले नाहीत. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले 16 टक्के आरक्षण हटविण्यात महाविकास आघाडी सरकारने धन्यता मानली. राज्यात जेव्हा युती सरकार आले तेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली गेली. आमच्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला.
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरु असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, यापूर्वी ओबीसी समाजाच्या संदर्भात निर्णय झाले तेव्हा मराठा समाजाने त्या विरोधात कधीही आंदोलन केलेले नाही. मात्र आताच काही लोकांनी मराठा समाजाच्या संदर्भात झालेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करून केवळ स्वतःच्या हट्टासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. मी यापूर्वीही त्यांना सल्ला दिला आहे, इतर समाजाच्या आक्षेपात तुम्ही लुडबुड का करता? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य म्हणजे लक्ष्मण हाके आपली राजकीय अपरिपक्वता सिद्ध करत आहेत, असे विखे पाटील म्हणाले.
हैद्राबाद गॅझेटियरमधून दाखले मिळविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासाठी गावपातळीवर समितीही नेमण्यात आली आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून घेतला जाणार असून, याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले. मराठा उद्योजक परिवार आणि इतर संस्थांच्या वतीने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले, आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकारच महत्त्वाचा होता.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ही महायुती सरकारची नेहमीच सकारात्मक राहिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपसमितीच्या माध्यमातून काम करण्याची दिलेल्या संधीमुळेच ऐतिहासिक निर्णय घेऊ शकलो. समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी योगदान देता आले याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.





