राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील वडनेर येथे चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 43 वर्षीय इसमाचा मृतदेह काल सोमवार दि. 2 मार्च रोजी दुपारच्या वेळी एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सदर इसमाचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.
संदीप भिमाजी गेठे (वय 43) रा. वडनेर, हे 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजे दरम्यान आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपासून संदीप गेठे यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. अखेर काल सोमवार दि. 2 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान घराच्या जवळच असलेल्या अशोक बारकू बलमे यांच्या विहिरीत संदीप गेठे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी वडनेरचे सरपंच विजय बलमे व किरण गव्हाणे यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार रामनाथ सानप हे तातडीने घटनास्थळी हजर झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत संदीप गेठे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. मयत संदीप गेठे यांचा घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून चार जणांवर संशय व्यक्त केला आहे. यावेळी पोलीस पथकाने एका संशयीताला तात्काळ ताब्यात घेतल्याचे समजते. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.





