इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे पक्षातर्फे सोमवार दि. १४ पासून इगतपुरीत राज्यस्तरीय ३ दिवस शिबिराला सुरुवात झाली. पक्षप्रमुख राज ठाकरे या शिबीरात कोणती भूमिका मांडणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र शिबीराच्या पहिल्याच दिवशी मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी उबाठा शिवसेना व मनसे युती बाबत बोलणे टाळल्याचे दिसुन आले. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे सोमवारी संध्याकाळी चार वाजता शिबीरास्थळी आगमण केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी हितगुत साधलं.
यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेची युती कधी होणार असा प्रश्न विचारला असता याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसुन आपण प्रमुख मुद्यावर चर्चा करू असे बोलून युती बाबत भाष्य करण्याचे टाळले. यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्लिश जर सुरु केले तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. ज्या पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिकवण्याची ऐपत नाही त्या पालकांना याचा निश्चीतच फायदा होईल. कारण एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असतांना या शाळांमध्ये सेमी इंग्लिश सुरू केल्यावर शाळा सुद्धा व्यवस्थीत सुरु राहतील व सर्वसामान्य गरीब पालकांना सुद्धा आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत पाठवल्याचे समाधान होईल.
नाशिक जिल्ह्याला पाच कॅबिनेट मंत्री असतांना सुद्धा जिल्ह्यात अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असुन ते सोडवले गेले नाहीत. तर नाशिक महानगर पालिकेतील अनेक भ्रष्टाचार उघड होत असतांनाही यावर सत्ताधारी मौन बाळगून आहेत. नव्याने झालेले महामार्ग, स्मार्टसिटी, उड्डाणपुले आदी रस्त्यांवर मोठ मोठ्या खडडयांचे साम्राज्य झाले असुन अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. मात्र सत्ताधारी कोणतीही उपाय योजना न करता ठेकेदारांना पाठीशी घालून सर्व सामान्य जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. असे असतांना शैक्षणिक, बेरोजगारी वाढत असुन प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण करून नौकरदार व युवा पिढीचे भवितव्य धोक्यात घालत आहेत. नवनवीन कायदे पारीत करून युवा पिढी समोर आव्हाने उभी केली जात आहे. निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नसल्या तरी मनसेने निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.
इगतपुरीतील हॉटेल कॅमल व्हली येथे मनसे पक्षाचे सोमवार ते बुधवार असे तीनदिवसीय शिबिराला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून मराठीच्या मुद्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मनसेला साथ लाभली आहे. आठवडाभरापूर्वी राज व उद्धव ठाकरे यांनी तब्बल वीस वर्षांनी राजकीय व्यासपिठावर एकत्रित येत मराठीचा सूर आळवला. या मेळाव्यात दोन्ही बंधूंनी भविष्यात एकत्र वाटचाल करण्याचे संकेत दिले होते. पण मेळावा पार पडताच राज ठाकरे यांनी शिवसेनेशी युती करण्यावरून कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यामुळे मनसैनिक व शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मनसेच्या शिबिरामध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. तसेच राज ठाकरेही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे इगतपुरीत राज ठाकरे कोणती नवी भूमिका घेणार? तसेच निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना कोणता कार्यक्रम देणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी स्वागत केले. या तीन दिवसीय शिबीरात आणखीही काही प्रलंबित मुद्दे तीन दिवस चालणाऱ्या सत्रात घेतले जाणार आहेत. या शिबिराला अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, अविनाश अभ्यंकर, सुदाम कोंबडे, ॲड. रतनकुमार इचम यांच्यासह राज्यातील मनसेचे मुख पदाधिकारी आणि राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गोसावी आणि पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.





