मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आजोबा समाजप्रबोधनकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे (Prabhodhankar Thackeray) यांची आज जयंती आहे.
यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करून आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये धर्माचा बाजार मांडणाऱ्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.
राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती… आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली.
आज जेंव्हा एखाद्या कळकळीच्या विषयवार तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, त्यावेळेस समाजसुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांच कौतुक करावं तितकं कमी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं.
आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे ‘देवांचा धर्म की धर्माची देवळे’… आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते.असो. पण आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच. आजोबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
व्यंगचित्रामधून शाह पिता-पुत्राला फटकारले
भारत आणि पाकिस्तानदरम्यान रविवार पार पडलेल्या सामन्यावरुन राज ठाकरेंनी शाह पिता-पुत्रावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये अमित शाह आणि जय शाह पहलगाममध्ये मरण पावलेल्यांना भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्याचं सांगत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. जय शाह मयत व्यक्तीचा हात कडून त्याला ‘अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तान हरले!’ असं सांगताना दाखवण्यात आलं असून बाजूला जय शाह हाताची घडी घालून उभे असल्याचं दिसत आहे. जय शहांचा ‘आयसीसी’ तर अमित शाहांचा ‘गृह’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यंगचित्रावर नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. बाजूलाच ‘पहलगाम’ अशी पाटी देखील दाखवण्यात आली आहे.





