अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
खरीप हंगाम 2025-26 च्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्यांना शासकीय अनुदानासोबतच प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता रब्बी हंगाम संपत आला असून मार्चएण्ड सुरू आहे. तरीही खरीप आणि रब्बी हंगामातील पिकविमा शेतकर्यांना मिळालेला नाही. यामुळे पिकविमा कंपनी आणि सरकारकडून शेतकर्यांचा खेळ सुरू असल्याचा आरोप होताना दिसत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असताना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे 8 लाख 27 हजार 118 शेतकर्यांचे 6 लाख 53 हजार 265 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यानंतर राज्य शासनाने हेक्टरी 8 हजार 600 रुपयांचे शासकीय अनुदान, रब्बी पेरणीसाठी 10 हजार रुपये आणि पीकविम्यातून 17 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. यानुसार अॅग्रीस्टॅक, केवायसी पूर्ण झालेल्या 5 लाख 40 हजार 756 शेतकर्यांना अनुदान वाटप करण्यात आले होते. दरम्यान, शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्याने अर्जदार शेतकर्यांची संख्या घटली. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 57 हजार शेतकर्यांनी 1 लाख 68 हजार 446 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षित राहावीत म्हणून विमा योजनेत सहभाग नोंदवून हप्ता भरला होता. यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, अद्यापपर्यंत विमा दाव्यांबाबत ठोस निर्णय जाहीर झालेला नाही.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीक कापणी प्रयोग, सॅटेलाइट अहवाल, महसूल व कृषी विभागाचा अहवाल हा शेतकर्यांच्या बाजूने आहे. तरीही खरीप, रब्बी हंगाम ओसरला तरीही शेतकर्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम जवळपास संपला आहे. आज 30 मार्च असून उद्या मार्च महिना संपणार आहे. यामुळे शेतकर्यांना आधीचा खरीप हंगामाचा आणि त्यानंतर रब्बी हंगामाच्या पिक विम्याची प्रतिक्षा आहे.
पिक विम्याबाबत प्रशासनाची चुप्पी
जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानी पोटी मिळणार्या पिक विमा अद्याप मिळालेला नाही. या पहिल्या टप्प्यात खरीप हंगामातील त्यानंतर रब्बी हंगामील पिकांचा समावेश आहे. या दोनही हंगामातील पिक विमा शेतकर्यांच्या पदरात कधी पडणार असा प्रश्न शेतकर्यांकडून विचारण्यात येत आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग देखील याबाबत बोलण्यास तयार नाही.
माहितीची जुळवाजुळव झाल्यावर भरपाई
पिक विम्याबाबत ऑनलाईन ऑप नोंदवलेली माहिती, गावोगावी तलाठी, कृषी साहयक आणि ग्रामसेवक यांनी दिलेल्या भेटी त्यानुसार भरलेल्या माहिती तसेच पिक कापणी प्रयोगाची माहिती या माहिती जुळवाजुळव पिक विमा कंपन्याकडून सुरू आहे. या माहितीचे एकत्रिकरण झाल्यावर पिक विमा कंपन्या शेतकर्यांना भरपाई देणार आहेत. मात्र, यासाठी किती कालावधी लागले हे सांगता येणार असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.





