मुंबई | Mumbai
काल (बुधवारी) भाजपाचे (BJP) विले पार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी (Parag Alavani) यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एकत्र आले होते. यावेळी मंत्री पाटील यांनी शिवसेना-भाजपा युतीसंदर्भात चर्चा झाली असून ही युती पुन्हा झाल्यस तो क्षण माझ्यासाठी सुवर्णक्षण असेल असे,म्हटल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता या चर्चेवर आज शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की,” चंद्रकांत पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तशा त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत. कारण आम्ही एकत्र पंचवीस वर्ष अत्यंत उत्तमरीतीने काम केले आहे.नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आम्ही चांगल्या पद्धतीने काम केले आहे. पण, सगळ्यांना माहित आहे की, दिल्लीमध्ये अमित शाह यांचा उदय झाल्यावर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट आले. आम्ही चंद्रकांतदादांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल योग्यवेळी उत्तर देऊ. मात्र, सध्या आमच्याकडे युतीची कोणतीही चर्चा नाही, ज्या भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत”, असे त्यांनी म्हटले.
तसेच मंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमीच शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) युतीचे समर्थक राहिले आहेत. शिवसेना आणि भाजपची जी जुनी पिढी होती, ज्यांनी एकत्र काम केले, त्यापैकी चंद्रकांतदादा हे एक आहेत. आता भाजपमध्ये हौशे, नवशे आणि गवशे आहेत. त्यांना शिवसेना-भाजपच्या २५ वर्षाच्या युतीचे महत्त्व समजणार नाही. आमच्या पक्षाच्या बैठकांत भाजप-शिवसेना युतीचा विषयही निघत नाही. पण भविष्यात काय होईल, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, पुढच्या घडामोडी काय घडणार आहे याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे सूचक विधानही यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली.
राऊत पुढे म्हणाले की, “आम्ही महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) गेलो त्याला कारण भारतीय जनता पक्षातील काही लोकांचा हट्ट आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो. पंचवीस वर्षाची आमची युती ज्या कारणासाठी तुटली ती कारणे जर आपण पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. आमचा पक्ष फोडल्यावर जे आम्ही मागत होतो, जो आमचा हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला. त्यांना मुख्यमंत्रीपदही दिले आणि उपमुख्यमंत्रीपदही दिले. मग आम्ही वेगळं काय मागत होतो? असा सवालही त्यांनी केला. तसेच अमित शहा यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती, त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत गुंतले होते. त्यामुळे आजही एकनाथ शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करत आहेत”, असेही त्यांनी म्हटले.