मुंबई | प्रतिनिधी Mumbai
देशासमोर निर्माण झालेले भीषण आर्थिक तसेच ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला दिलेली पोलीस सुरक्षा आणि त्यासोबत दिलेली वाहने काढून घेण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे.
पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या इंधन आणि ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी शनिवारी एक्स या समाज माध्यमातून आपली पोलीस सुरक्षा आणि वाहने काढून घेण्याची मागणी केली आहे.
आज इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझे शासनाला नम्र आवाहन आहे की, कृपया आपण माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबत दिलेली वाहने तातडीने काढून घ्यावी. देशावरील उर्जा आणि आर्थिक संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेव्हा अगदीच गरज भासल्यास ती पुन्हा बहाल करण्याचा विचार करावा. परंतु सद्यस्थितीत आपण कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त आणि गाड्या काढून घ्याव्या, असे सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.





