मुंबई । Mumbai
मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी थाटामाटात उद्घाटन झालेल्या या आधुनिक बोगद्याची दुरवस्था झाली असून, यात मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. “हा मिसिंग लिंक प्रकल्प नसून ‘भ्रष्टाचाराला लिंकिंग’ करणारा मार्ग आहे,” अशा तिखट शब्दांत पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी या मिसिंग लिंक मार्गिकेवर तब्बल १०० टन मातीचा ढिगारा आणि दरड कोसळली. यामुळे हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. साडेअठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा रस्ता कसातरी खुला करण्यात आला असला, तरी सध्या केवळ दोनच लेनवरून वाहतूक सुरू आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या नव्याने बांधलेल्या बोगद्याला अंतर्गत भागात मोठे तडे (क्रॅक) गेले असून, आतून पाण्याचे फवारे उडत आहेत. बोगद्याच्या वरून अजूनही धबधब्यासारखे पाणी खाली येत असून त्यासोबत छोटे दगडही कोसळत आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या परिस्थितीचा दाखला देत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली. “उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आता हा शेवटचा ट्रॅफिक असेल’ असे सांगत महामार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. नंतर जेव्हा खड्ड्यांचे फोटो आले, तेव्हा ‘प्रकल्प स्थिर होण्यासाठी एक पावसाळा जाऊ द्यावा लागतो’ असे अजब समर्थन त्यांनी केले होते. परंतु, इथे केवळ शब्दांचा खेळ नको, तर कामाचा दर्जा उत्तम असायला हवा,” असा टोला पवारांनी लगावला.
या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ‘नवयुगा इंजिनिअरिंग’ आणि ‘ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ (Afcons Infrastructure) या कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर रोहित पवारांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. ‘नवयुगा’ कंपनीचा संबंध वादग्रस्त ‘व्हीएसआर’ कंपनीशी आहे, ज्यांच्यावर आधी कोणतीही कारवाई झाली नव्हती आणि तरीही त्यांना हा महत्त्वाचा प्रकल्प देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. जर या संपूर्ण प्रकल्पात जनतेच्या पैशांचा एवढा मोठा अपहार झाला असेल आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जात असेल, तर सरकारने ‘ॲफकॉन्स’ आणि ‘नवयुगा’ या दोन्ही कंपन्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.




