अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढवण्यासाठी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार जानेवारी अखेर 100 टक्के शास्ती माफ करण्यात आली होती. यात आठ हजार 845 मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला. आता नागरिकांच्या मागणीनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत शास्तीमध्ये 100 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. 15 दिवस मुदत वाढवून देण्यात आली असून, थकबाकीदार नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
महानगरपालिकेने 8 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत 100 टक्के शास्तीमध्ये सवलत दिली होती. तर फेब्रुवारी महिन्यात 75 टक्के सवलत दिली होती. जानेवारी महिन्यात आठ हजार 845 थकबाकीदारांनी सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला. मात्र, नागरिकांकडून 100 टक्के शास्ती माफीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याचा विचार करून आता 15 फेब्रुवारी पर्यंत 100 टक्के शास्तीमाफीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी या 100 टक्के सवलत योजनेचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा.
महानगरपालिका प्रशासनाने सर्व प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यास सुरूवात केली आहे. जप्ती कारवाई सुरू असून, 15 फेब्रुवारीनंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार मालमत्ता धारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी केले आहे.