मुंबई | Mumbai
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी याबाबत न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ही प्रक्रीया झाली आहे.
सर्वोच्च न्यायालय दिल्ली, यांनी विशेष अनुमती याचिका क्रं ९८८३-२०२५ मधील ३० जुलै २०२५ रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे आणि मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या १८ डिसेंबर २०२४ च्या अर्जावरून दिलेल्या फिर्यादीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात शुक्रवारी मध्यरात्री नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेल्या औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नसून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि सोमनाथचे कुटुंब काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने अगोदर या खुनाच्या प्रकरणात कोण पोलीस दोषी आहेत त्याची जबाबदारी निश्चित करून मग नावे या गुन्ह्यात समाविष्ट करावीत असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात स्वत: न्यायालयात युक्तिवाद केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. दुर्दैव हे आहे की, राज्य शासनच आरोपी आहे या केसमध्ये. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू सरकारच्या ताब्यात असताना झाला आहे. मागच्या सगळ्या केसेसमध्ये शासनाचा नेहमीचा प्रयत्न हात झटकण्याचा, तो यामध्येही केला. आम्ही कोर्टाला ही बाब लक्षात आणून दिली, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
बुधवारी दिलेल्या आदेशानंतर अखेर सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकाल कायम ठेवत याचिका फेटाळली. याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर विजयाबाई सूर्यवंशी यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १५ डिसेंबरला सकाळी नऊ वाजेच्यापूर्वी ही घटना घडली. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





