राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे रविवारी (दि. 19 जुलै) सकाळी झालेल्या भीषण अपघातात श्रीरामपूर तालुक्यातील नरसाळी येथील 46 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत दुचाकीवर प्रवास करणारा मुलगा व 8 वर्षांची नात सुदैवाने बचावली. ज्योती भाऊराव माळी (वय 46, रा. नरसाळी, ता. श्रीरामपूर) या त्यांचा मुलगा अक्षय बाबासाहेब माळी आणि आठ वर्षीय नात दीपाली अक्षय माळी यांच्यासह रविवारी सकाळी सुमारे 9.15 वाजता दुचाकीवरून नगर-मनमाड महामार्गाने कोल्हारच्या दिशेने जात होत्या.
कोल्हार खुर्द येथील साई मंदिरासमोर आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमपी 08 झेडएम 1637 क्रमांकाच्या कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही खाली पडले. त्यामध्ये ज्योती माळी या कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. कंटेनरने त्यांना काही अंतर फरफटत नेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलगा अक्षय माळी आणि नात दीपाली हे बाजूला पडल्याने गंभीर अनर्थ टळला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रवीण बागुल, बाबासाहेब शेळके, पोलिस नाईक सागर नवले तसेच रुग्णवाहिका चालक निखिल भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून मृतदेह लोणी प्रवरा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




