अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे 24 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या साळवे कुटुंबीयांवरील जीवघेण्या हल्ल्याच्या तपासात एक धक्कादायक वळण आले आहे. या हल्ल्यामागे कुख्यात सराईत गुंड नीलेश घायवळ याचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. घायवळसह ऋषी गायकवाड याला देखील या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी दिली.
तुम्ही काय आमची दहशत संपवता, तुम्ही गाव बंद करून, भाषणे करून आमची दहशत संपविण्याची भाषा करता त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला मारून टाकतो, अशी धमकी देत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर तलवार, काठ्या व इतर प्राणघातक शस्त्रांनी निर्दयपणे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सातजण जखमी झाले होते. घटनेनंतर जामखेड पोलिसांनी खूनाचा प्रयत्न, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) व अन्य कलमान्वये एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल केला होता. यात 12 जणांचे नावे पोलिसांनी निष्पन्न केली होती तर दोन अनोळखी होती.
या गुन्ह्यात आतापर्यंत नऊ जणांन अटक करण्यात आली असून इतर पसार संशयितांचा शोध सुरू आहे.
अटकेतील संशयित आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली. तसेच या गुन्ह्याच्या सखोल व तांत्रिक तपासात पोलिसांना असे लक्षात आले की, नीलेश घायवळ आणि त्याचा साथीदार ऋषी गायकवाड यांनी हल्ल्याचा पूर्वनियोजित कट रचून साळवे कुटुंबियांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे साथीदारांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या या हल्ल्यामागे घायवळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो घटनेच्या आधी काही दिवस नान्नज परिसरात येऊन गेल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
घायवळचा गुन्हेगारी इतिहास भयावह
नीलेश घायवळ हा मुळचा सोनेगाव (ता. जामखेड) येथील रहिवासी असून, तो पुणे शहरात सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्कात असल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याविरूध्द खून, खंडणी, मारहाण, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न व दहशत निर्माण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत आहे. त्याने बनावट पासपोर्ट मिळवून काही दिवसांपूर्वीच परदेशात पलायन केले आहे.




