चिपळूण | Chiplun
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते दौरे आणि सभांमध्ये व्यस्त आहेत. अशातच, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली. भाषणादरम्यान नारायण राणे यांना भोवळ आली.
राणे यांचे भाषण शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांचा आवाज बसला, तसेच त्यांना चक्कर आली, त्यामुळे त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. यावेळी राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास देखील नकार दिला. कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले.
नवनीत राणांच्या वक्तव्यावर ओवेसींचं प्रत्यूत्तर, म्हणाले, “तुम्ही चार नाही तर…”
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सध्या ‘कृषी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या कार्यक्रमाला नारायण राणे उपस्थित होते. व्यासपीठावर भाषण करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना भोवळ आली. यावेळी जवळच असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने आधार दिला.
कालच नारायण राणेंनी दिले निवृत्तीचे संकेत
कालच नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. “आता वयोमानानुसार थांबायला हवे,” असे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असतानाच, आज त्यांना भोवळ आल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढते वय आणि कामाचा व्याप यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच त्यांनी निलेश राणे आणि नितीश राणे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी जो वाद निर्माण झाला होता, त्या वादावर देखील भाष्य केले.




