नाशिक | प्रतिनिधी | Nashik
द्वारका भागात उड्डाणपुलावर (Dwarka Flyover) लोखंडी सळईंनी (लोखंडी गज) भरलेला ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात (Terrible Accident) रविवारी (ता. १२) घडला होता. अपघात घडताच ट्रकचालक फरारी झाला होता. भद्रकाली गुन्हेशोध पथकाने त्यास नाशिकरोड (Nashik Road) येथून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या अपघातातील मृतांची एकूण संख्या सात झाली असून जखमींच्या प्रकृतित सुधारणा हाेत आहे.
धुळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील अय्यप्पा मंदिरासमाेरील द्वारका चौक उड्डाणपुलावरील पथदीप क्रमांक ७९ येथे रविवारी सायंकाळी अपघात झाला हाेता. सळईंनी भरलेला आयशर ट्रक (एमएच २५ यू ०५०८) व टेम्पो (एमएच १५ एफव्ही ५६०१ दोन्ही वाहने धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. द्वारका चौकातील उड्डाणपुलावर आयशर ट्रकवर मागून येणारा टेम्पो जोरदार आढळला. अपघातात ट्रकमधील सळई टेम्पोतून समाेर बसलेल्या अतुल मंडलिक, चेतन पवार, दर्शन घरत, यश खरात, संतोष मंडलिक, विद्यानंद कांबळे, अनुज सुनील घरटे यांच्या शरीरात व डाेक्यात शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर (Accident) काही वेळातच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. रात्री उशिरा पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक समीर निसार शहा याच्यासह ट्रकमालक अशोककुमार दुर्गानंद यादव (वय ४१, रा. चुंचाळे शिवार, अंबड), तसेच लोखंडी सळई भरून देणारा मनोजकुमार मेहरचंद दिमान (४५, रा. रवींद्र हायस्कूलजवळ, द्वारका) अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यातील ट्रकमालक आणि सळई भरून देणारा दोघांना रविवारी रात्री ताब्यात घेतले होते. ट्रकचालक मात्र फरारी झाला होता.
दरम्यान, त्यानंतर भद्रकाली गुन्हे शाखेने (Bhadrakali Crime Branch) त्याचा माग काढत नाशिक रोड येथील चेहडी भागातून सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले. ट्रकमालक आणि सळई भरून देणारा दोघांना बुधवार (ता. १५) पर्यंत, तर ट्रकचालकास गुरुवार (ता. १६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते पुढील तपास करीत आहेत.