नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पाच महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या दोघांत घरगुती व व्यावसायिक कारणातून झालेल्या वादाचा (Dispute) भडका थेट खंडणीचा गुन्हा दाखल होण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. उभयतांना परस्पर घटस्फोट हवा असताना विवाहितेच्या (Married Woman) वडिलांनी जावयाने पाच लाख रुपयांची खंडणी मागून मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. विशेष म्हणजे घटस्फोटासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी जावयाने खंडणीची मागितल्याचे तपासात समोर येत आहे.
त्यानुसार, संशयित (Suspected) जावई कृष्णा बाळू गायकवाड (रा. गणेश नगर, नांदूरगाव) याला उपनगर पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पाच ते सहा महिन्यांपूर्वीच प्रकरणातील जावई कृष्णा बाळू गायकवाड याचा विवाह मनोज कांताप्रसाद मिश्रा (वय ४८, रा., सातभाईनगर, जेलरोड) यांच्या मुलीशी झाला आहे. मात्र, विवाहानंतर उभयतांसह कुटुंबात वाद उद्भवत होते. कुरबुरी वाढल्याने दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र, त्यातून वाद आणखीच टोकाला जाऊ लागले.
दरम्यान, विवाहितेचे वडील मनोज मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ जुलै राजी रात्री साडेनऊ वाजता व्यवसाय आटोपून वाहनाने घराजवळ आले. बाहेर थांबले असतानाच, जावई कृष्णा व त्याचा साथीदार आला. तेव्हा कृष्णा याने मिश्रा यांना धमकावत ‘मला पाच लाख रुपये दे, दे, नाहीतर तुझा व तुझ्या मुलीचा जीव घेईन, लग्नाचे फोटो व्हायरल करुन तिचा विवाह होऊ देणार नाही’, असे धमकावले. यावरच न थांबता तलवारीचा धाक दाखवून ‘पैसे दिले नाही तर गेम करेन’, अशी धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
अन् मारली लाथ….
संशयित कृष्णा व त्याचा साथीदार वाद घालत असतानाच, मिश्रा धास्तावले. यानंतर त्यांना लाथ मारून संशयित निघून गेले, असा दावा मिश्रा यांनी फिर्यादीत केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटस्फोट घेण्यातून हा वाद समोर आला असून येणाऱ्या न्यायालयीन कामकाजाच्या खर्चापोटी कृष्णाने पाच लाख रुपये मागितल्याचे समोर येते आहे. तपास सहायक निरीक्षक दाभाडे करत आहेत.





