नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांनी मालेगावसह (Malegaon) राज्यातील अन्य ठिकाणी बनावट जन्मप्रमाणपत्र (Fake Birth Certificates) प्राप्त केल्याच्या तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने उशिराने जन्म, मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. या दाखल्यांमध्ये जिल्हा प्रशासनाला अनेक त्रुटी आढळून आल्याने या संदर्भातील शासनाने परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) नियुक्त केली आहे.
या पथकातील अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मालेगावी महापालिका कार्यालयासह (Municipal Office) रुग्णालये आणि शाळांमधील कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी तत्काळ कारवाईतून दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विहित कालावधीत जन्म किंवा मृत्यूची नोंद करावयाचे राहून गेल्यास जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९ नुसार न्यायालयीन कार्यवाहीद्वारे संबंधितांना जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची पद्धत अस्तित्वात होती. मात्र नागरिकांना सुलभ पद्धतीने अशी प्रमाणपत्रे प्राप्त करता यावीत म्हणून २०२३ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली.
त्यानुसार उशिराने जन्म, मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे अधिकार तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांना प्रदान केले होते. त्यानंतर मालेगावमध्ये जवळपास तीन हजार जन्माचे प्रमाणपत्र देतांना लागणारे पुरावे हे संपूर्णतः तपासले गेले नसल्याचे प्रथमदर्शनी तपासणी पथकाच्या निदर्शनास आले आहे.जन्म दाखल्यांसाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये (Documents) मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. या त्रुटींकडे दुर्लक्ष करत दाखले वितरित झाले असल्याचे समोर आले आहे.
५ जण निलंबित
यात प्रथमिक दोषी आढळलेल्या तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार व दोन लिपिक व अव्वल कारकून यांना निलंबित करण्यात आले आहे. एसआयटीच्या चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे यात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. तर लिपिक विजय अंभोरे व रेहान शेख, अव्वल कारकून भरत शेवाळे यांच्यावर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे त्यामुळे पुढील कारवाईसाठी एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
घुसखोरांचे काय?
रोहिंग आणि बांगलादेशी घुसखोरांनी मालेगावसह राज्यातील अन्य ठिकाणी बनावट जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे दाखले मिळाल्याने त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे? असा सवालही उपस्थित केला जात आहे.