नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत दहशत माजवणारा आणि एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई झालेला फरार संशयित अरबाज मोहम्मद शेख (२५) याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या (Nashik Crime Branch Unit) अंबड युनिट-३ ने मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. विक्रोळी परिसरात सापळा रचून पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली.
शिवाजीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या अरबाज शेखवर २०१७ पासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात प्रामुख्याने खून आणि खुनाचा (Murder) प्रयत्न जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे आणि धमक्या देणे असे गुन्हे नोंद आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे २०२३ मध्ये त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र, वर्तनात सुधारणा न झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश जारी केले होते. तेव्हापासून तो पोलिसांना (Police) गुंगारा देत होता.
अरबाज मुंबईतील (Mumbai) विक्रोळी (टागोरनगर) भागात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक मुंबईला रवाना झाले. २५ एप्रिलच्या रात्री पोलिसांनी टागोरनगर परिसरात दबा धरला. रात्रभर चाललेल्या या थरारानंतर, पहाटे तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी अरबाजला घेरले आणि मुसक्या आवळल्या. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांच्या पथकाने केली.
पुन्हा नाशिकमध्ये येऊन खुनाचा प्रयत्न
तडीपार आणि फरार असतानाच अरबाज २० एप्रिल २०२६ रोजी छुप्या मार्गाने नाशिकमध्ये आला होता. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याने शिवाजीनगर भागातील गणेश बोरा या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी २१ एप्रिल रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.




