नाशिक | प्रतिनिधी
भाजपला १०० चा आकडा पार करायचा होता मात्र ७२ जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले. हा आकडा म्हणजे आमचे स्पष्ट बहुमत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशकात महायुतीची सत्ता हवी असल्याने आम्ही शिवसेनेला सोबत घेत त्यांना उपमहापौर हे पद दिले. आम्ही दोघे एकत्रित झाल्याने १०० चा आकडा आम्ही पार केला आहे. नाशिकच्या कुठल्याही कामांत आम्ही मागे पडणार नाही. नाशिकचा विकास हाच आमचा केंद्रबिंदू असणार आहे. याठिकाणी कुठलाही निधी आम्ही कमी पडू देणार नाही याची ग्वाही आम्ही देतो.
नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर महापौर निवासस्थानी रामायण बंगला येथे ना. महाजन माध्यमांशी बोलत होते. आगामी काळ सिंहस्थ कुंभमेळ्याचा आहे त्यासाठी निधी देखील मोठ्या प्रमाणावर आला आहे. नाशिकच्या विकास कामांकडे जास्त लक्ष द्यायचे असल्याने सिंहस्थापर्यंत नाशिकमध्येच मुक्कामी राहणार असल्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
यावेळी महाजन पुढे म्हणाले कि,राज्यात अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढलो आणि नंतर एकत्र आलो. केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहोत त्यामुळे महापालिकेतही आम्ही एकत्र आलो. आगामी कुंभमेळा आव्हानात्मक आहे त्यामुळे खूप काम करायचे आहे. मछिंद्र सानप यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला होता मात्र वरिष्ठांच्या सांगण्यानुसार त्यांनी माघार घेतली त्यामुळे निश्चितच त्यांचा आम्ही पुढे विचार करू.
यावेळी महापालिका निवडणुकीतील एक्झिटपोल बद्दल बोलतांना महाजन म्हणाले कि,आमचा आकडा ५० च्या पुढे एक्झिटपोलने दाखवला नाही मात्र तरीसुद्धा आम्हाला ८० जागांपर्यंत खात्री होती चार पाच जागा कमी पडल्या पण आमच्या ७२ जागा निवडून आल्या.आता नाशिकचा चेहरा मोहरा बदलायचा आहे त्यामुळे नाशिककर येणाऱ्या दोन वर्षांच्या काळातच नाशिकचा विकास झालेला बघणार आहेत.
यावेळी मालेगाव महालिकेबाबत बोलतांना महाजन म्हणाले कि, आम्हाला महापौर पदासाठी मदत लागत असल्यास आम्ही एमआयएम पक्षासोबत कदापिही जाणार नाही मग आम्हाला तटस्थ भूमिका घ्यावी लागली तरी चालेल.




