
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
शहरातील विविध रस्त्यांची कामे सुरू असतानाच खड्डे (Potholes) बुजवण्याच्या कामाचा दर्जा आणि त्यावर होणाऱ्या देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाथर्डी फाट्याकडून अंबड गावाकडे (Ambad Village) जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी (दि.३) सकाळच्या सुमारास मातीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फसल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या प्रकारामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
नाशिक शहरात (Nashik City) सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. विविध भागांतील खड्डे बुजविण्याची कामेही केली जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी खड्डे केवळ वरवर बुजवले जात असून, त्यासाठी योग्य पद्धतीने डांबर अथवा खडीचा वापर केला जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पावसामुळे अथवा वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडत असून, रस्त्यांच्या कडेला मोठे खड्डे निर्माण होत आहेत. पाथर्डी फाटा-अंबड गाव मार्गावर घडलेल्या घटनेमुळे खड्डे बुजविण्याच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवजड वाहन रस्त्याच्या कडेला जाताच चाक खड्ड्यात रुतत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
याच मार्गावर गेल्या महिन्यात अंबड गावाजवळील वजन काट्यासमोरही ट्रकचे चाक खड्ड्यात फसले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वारंवार अशा घटना घडूनही महापालिकेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्त्यांवरील (Road) खड्डे बुजविताना केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कामाचा दर्जा तपासावा, तसेच धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रस्त्यांची कामे सुरू असताना नागरिकांना (Citizen) जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.




