नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सर्वत्र सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा जयघोष सुरू असतानाच नाशिकमध्ये (Nashik) एका खासगी शाळेतील शिक्षिकेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर भागात शुक्रवारी (दि. ३) घडली. तिच्या आत्महत्येचे (Suicide) नेमके कारण समोर आले नसले तरी पती आजारपणातून बाहेर येत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. याबाबत इंदिरानगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडनेर-पाथर्डी रस्त्यावरील (Vadner-Pathardi Road) एका पडिक व मोकळ्या जागेलगत असलेल्या पडिक घराच्या भिंतीच्या खुंटीला गळफास बांधून ज्योती प्रकाश बाविस्कर (४८, रा. पार्कसाईड, पाथर्डी फाटा) या शिक्षिके ने आत्महत्या केली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ‘डायल ११२’वर एका जागरुक नागरिकाने इंदिरानगर पोलिसांना (Indiranagar Police) महिलेच्या आत्महत्येची माहिती दिल्यावर घटनेचा उलगडा झाला. मोरवाडी येथील एका प्राथमिक विद्यालयात शिक्षिका असणाऱ्या ज्योती बाविस्कर यांनी शुक्रवारी (दि. ३) आत्महत्या केल्याचे समोर आले.
इंदिरानगर पोलिसांना सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर पथकाने (Squad) धाव घेतली. मोपेड वाहन रस्त्यावर उभे करून महिलेने पडिक घरात गळफास घेतल्याचे दिसले. तेथून पोलिसांनी चष्मा, मोबाईल, पर्स जप्त केले आहे. दरम्यान, बाविस्कर यांचे पती ग्रामसेवक असून, त्यांच्यावर यकृताच्या आजारामुळे काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्योती यांच्या पतीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या काही दिवसांपासून रजेवर होत्या. ज्योती यांच्या पश्चात पती, २३ वर्षीय मुलगी व २१ वर्षांचा मुलगा आहे. ज्योती यांच्या निधनाचे वृत्त समजताच शाळेतील सहकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेत शोक व्यक्त केला. यासह शनिवारी (दि. ४) पूर्वनियोजित शालेय सहलदेखील तातडीने रद्द करण्यात आली. दरम्यान, ज्योती यांनी आत्महत्या का केली यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांचा तपास सुरू होता.
काय घडले?
ज्योती यांचे पती रुग्णालयात (Hospital) असल्याने त्यांची मुलगी गुरुवारी रात्री तिथे मुक्कामी होती. शुक्रवारी सकाळी मुलगी घरी परतल्यानंतर ज्योती या ‘बाहेर जाऊन येते’ असे सांगून घरातून निघाल्या. बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने शाळेत व रुग्णालयात मुलीने चौकशी केली. मात्र कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, सायंकाळी पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाल्यावर या घटनेचा उलगडा झाला. तर ज्योती यांच्या पर्समध्ये असलेल्या किराणा दुकानातील चिट्ठीवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यांच्या पतीची प्रकृती अधिक चिंताग्रस्त असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता आहे. तसेच पतीस काही झाले तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईन, असे ज्योती यांनी मुलीस नुकतेच सांगितले होते.