नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दोन दिवस पावसाने नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे गोदावरीला पूर येऊन दुतोंड्या मारुतीही बुडाला होता. यानंतर आज पूर कमी झाला असून, गोदाघाटावर नागरिकांची गर्दी दिसत आहे. पंरतु, या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शहरात घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
अशातच आता नाशिक शहरातील वडाळा (Wadala) येथील गोपाळवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे एका दिव्यांग व्यक्तीचा (Disabled Person) मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. दिलीप बारकू ठाकरे (वय ६२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, ठाकरे हे जुन्या तलाठी ऑफिसच्या पाठीमागील झोपडपट्टी भागात विटामाती व पत्र्याच्या कच्च्या घरात राहत होते. यावेळी घराची भिंत कोसळली असता त्यात त्यांचा मृत्यू (Death) झाला. तर या दुर्घटनेत त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





