चांदवड | वार्ताहर | Chandwad
तालुक्यात पावसाने (Rain) मागील आठवड्यापासून जोरदार तडाखा दिल्याने ऐन उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांच्या (Farmer) स्वप्नांवर पाणी फिरले आहे. शेतकऱ्याच्या कांदा, मका, सोयाबीन द्राक्षे आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नारायणगाव, भाटगाव, केंद्राई धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पिकांच्या नुकसानीची शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी पहाणी केली.
तालुक्यात ७ ते ८ दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. यात काढणीला आलेला मका, सोयाबीन तर लागवड केलेले कांदा, द्राक्ष, टोमेंटो पीक तसेच भाजीपाला पूर्णपणे खराब झाला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने गावागावातील तलाव,बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. तर बऱ्याच गावांचा (Village) संपर्क तुटला आहे.
दरम्यान, यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, संदीप उगले, नीलेश ढगे, रोहित ठाकरे, आदींसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पहाणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला. तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्याचा विश्वासही चौधरी यांनी दिला. तर शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
तालुक्यातील आठ महसूल मंडळ निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी (मिलीमीटर मध्ये)
१) चांदवड-७५.५ (६५१.८)
२) रायपुर-७२.८ (४९४)
३) दिघवद-७१.८ (४५९.३)
४) दुगाव-७२.८(५६७.८)
५) वडनेरभैरव-६९.८ (५१४.६)
६) वडाळीभोई-६६.३ (५९६.४)
७) धोडंबे-५२.८ (४८५)
८) शिंगवे-७१.८ (४०७.८)
एकुण – ५५३.६ (४१७६.७)
सरासरी – ६९.२ (५२२.९)





