
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
रामकुंड परिसरातील चक्रधर स्वामी मंदिराजवळ गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील पर्यटकांच्या गटातील पाच जण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच गंगेवरील जीवरक्षक दल तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पाचपैकी चार जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. यातील एका पर्यटकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती असून, त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे रामकुंड परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. गोदावरी नदीपात्रात पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न घेता पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासन व जीवरक्षक दलाकडून करण्यात येत आहे.




