नाशिक | Nashik
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील १७ विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यातील सहा जागांवर निवडणूक बिनविरोध झाली असून, उर्वरित जागांसाठी १८ जूनला मतदान (Voting) होणार आहे. तर २२ जूनला निकाल घोषित होईल. या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. विशेष करून मविआच्या उमेदवारांना माघार घ्यावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी उफाळून आली. यावर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, “विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर भाजपकडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजपची (BJP) कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवण्याची नीती असून, त्यासाठी गैरप्रकारांचाही वापर केला जात असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीत माघारीनंतर नाराजीचे नाट्य दिसत असले, तरी लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या मार्गांचा वापर करून भाजपने अनेकांना माघार घ्यायला भाग पाडले”, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
तसेच नाशिक शहरातील (Nashik City) कुंभमेळ्याच्या कामांवरूनही थोरात यांनी प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले की, कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, नाशिक रोड ते शहर असा प्रवास करण्यासाठी तब्बल एक ते दीड तास लागत आहे. शहराची इतकी बिकट अवस्था प्रथमच पाहत आहे. महापालिका प्रशासन कार्यरत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. कोणत्याही प्रकारच्या नियोजनाशिवाय खोदकामाची कामे सुरू आहेत, अशी नाराजी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन नाशिकमधील परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीबाबत काय म्हणाले?
पुढे ते म्हणाले की, “नाशिक विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) उमेदवार न देण्याबाबत महाविकास आघाडीची बैठक झाली असावी आणि त्यामध्ये काही रणनीती ठरवण्यात आली असावी, असे म्हटले. तसेच नाशिक विधानपरिषद निवडणुकीबाबत नेमका कोण कोणाला पाठिंबा देत आहे, यावरून महायुतीमध्ये मोठा गोंधळ असल्याचे चित्र दिसून येत आहे, असा दावाही थोरात यांनी केला.
सुप्रिया सुळेंना टोला
दरम्यान, “मतांची बेरीज नाही, तर निवडणूक कशाला लढायची?” असे म्हणणारे आमच्यातही आहेत, असे सांगताना त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टोला लगावला. यामुळे उमेदवारी मागे घेण्यावरून मविआमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.




