नाशिक | Nashik
मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल,अमेरिका युद्ध सुरु असल्याने जगासमोर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. याचा फटका आता भारतालाही (India) बसत आहे. केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरची साठेबाजी टाळण्यासाठी सिलिंडर बुकिंग करण्यासाठीचा कालावधी १५ दिवसांवरुन २१ दिवसांवर करण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन सिलिंडरच्या बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असावे लागणार आहे. युद्धाच्या तणावामुळे एलपीजी (LPG), पीएनजी (PNG) आणि औद्योगिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने नाशिकमध्ये देखील व्यावसायिक गॅसची टंचाई भासू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील (Nashik) हॉटेल व्यावसायिकांकडे पुढील २४ तास पुरेल एवढाच साठा उपलब्ध असल्याचे समजते. यात अंबड आणि सातपूर परिसरातील (Ambad and Satpur Area) अनेक उद्योगांची उत्पादन प्रक्रिया एलपीजी,पीएनजी आणि एमएनजीएल (MNGL) गॅसवर चालते. मात्र, सध्या गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्याने उद्योजकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
याबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार “देशातील प्रत्येक भागातील हॉटेल्सला व्यावसायिक गॅसचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे फक्त नागरिकांवरच नाही तर व्यावसायिक गॅस (Commercial Gas) संबंधित असणार्या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ येईल. नाशिक जिल्ह्यात हजारच्या आसपास हॉटेल आहेत. त्यामुळे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी हॉटेल संघटनेचे प्रतिनिधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या संपर्कात असून, गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावी” अशी मागणी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उत्पादन थांबवावे लागणार
दरम्यान, गॅस पुरवठादार कंपन्यांकडून उद्योजकांना अधिकृत ई-मेल पाठवून अनिश्चित काळासाठी गॅस पुरवठा सुरळीत होऊ शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांना उत्पादन तात्पुरते थांबवावे लागण्याची शक्यता आहे. गॅसची ही टंचाई कायम राहिल्यास नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतीतील छोट्या-मोठ्या कंपन्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.





