कवडदरा । वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, पिंपळगाव, साकूर परिसरात मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन घेतले जाते. काही परिसरात हरभरा काढणीसही सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण तसेच रोज कमी-जास्त होणारी थंडी व धुक्याचा विपरीत परीणाम हरभर्याच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येते.
परिसरात काही भागात हरभरा काढणीस वेग आला आहे. मात्र बदलते हवामान, अळीचा प्रादुर्भाव, सातत्याने पडणारे धुके आणि कमी जास्त होणारी थंडी यामुळे हरभरा उत्पादनात घट झाल्याचे दिसत आहे. यंदा खरिपाचे पीक अवकाळी पावसाअभावी हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हे नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, अशी शेतकर्यांना आशा होती.
मात्र, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. यंदा शेतकर्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू आदी पिकाचे उत्पादन घेतले. यावर्षी गव्हाबरोबरच हरभर्याचे क्षेत्रही अधिक प्रमाणात आहे. पुढील पिके घेता यावीत, तसेच अर्थार्जनही व्हावे यासाठी हरभर्याची पेरणी केली जाते. बाजारपेठेत हरभर्याला आणि डाळीलाही सततच मागणी असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात देशी व संकरित जातीच्या हरभर्याची पेरणी करतात.
यंदा रब्बीच्या सुरुवातीस परतीच्या पाऊसाचा फटका बसला; तसेच जमिनीची आर्द्रता जास्त असल्याने हरभर्याला मर रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पहिली पेरणी वखरणी करुन दुबार पेरणी केली आहे. मात्र वातावरण बदलाने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. या परिस्थितीत केलेला खर्च निघणेही कठीण होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हरभर्याला एक किंवा दोन फवारण्या कराव्या लागतात. परंतु यावेळी दोन ते चार फवारण्या कराव्या लागल्या असून आर्थिक झळ सोसावी लागली आहे. त्यातच वाढलेली मजुरी व एकीकडे मंजुराची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.




