नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुंभ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज (बुधवारी) प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान नदीपात्रातील (River Basin) पाण्याची पातळी, पूरनियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली यंत्रणा तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेची तयारी याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
यावेळी नागरिकांच्या (Citizen) जीवित व मालमत्तेचे संरक्षण हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या.
या पाहणीवेळी महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नगरसेवक-नगरसेविका तसेच महापालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून पूरस्थितीवर (Flood Conditions) सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




