नाशिक | Nashik
अमेरिका-इस्त्राइल आणि इराण युद्धामुळे (America Israel and Iran) आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना (Maharashtra Citizen) सोडविण्यासाठी शासनाचे प्रयत्न वेगाने सुरू असून, दोन ते तीन दिवसात त्यांना आणण्यात येईल. ग्रुप कॉल करून ३०० ते ४०० जणांशी संवाद साधला असून, अधिकारीही त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिक (Nashik) येथे शासकिय यंत्रणांच्या कुंभ मेळा बैठकीसाठी महाजन आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, युद्धजन्य (War) परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये काही महाराष्ट्रातील नागरिक अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी शासनाने विशेष पथक नियुक्त केले आहे. संबंधित अधिकार्यांकडून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेतली जात असून, भारतीय दूतावास तसेच केंद्र शासनाच्या यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. कोणताही नागरिक असुरक्षित राहणार नाही. त्यांना सुरक्षित रित्या मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.
तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेवर बोलतांना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, नाशिक ग्रामीणचे पोलीस (Nashik Rural Police) अधीक्षक यांना या प्रकरणात तातडीचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका व्यक्तीला चार ते पाच जण मारहाण करत आहेत. त्याचे कपडे फाडत आहेत हे अतिशय चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले.
मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हे
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस शिपाई गोविंद बोराडे (३९), नेमणूक त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे, यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी म्हणून (१) पप्पू नानाजी आचारी, रा. इंदिरानगर, त्र्यंबकेश्वर, (२) तुकाराम उमेश बुरूंगे, रा. त्र्यंबकेश्वर तसेच इतर ३ ते ४ सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





