मुंबई | Mumbai
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत ३० जणांची नावे निवडण्यात आली. ही यादी दिल्लीत पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय दिल्लीतून होणार आहे. त्यामुळे संभाव्या ३० नेत्यांमधून कोणाला संधी मिळणार याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीला पाठवलेल्या यादीमध्ये प्रशांत परिचारक, राम सातपुते, सुरेश हळवणकर, निलय नाईक, प्रकाश पाटील देवसरकर, राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर,प्रज्ञा सातव, राजा राऊत, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, सुरेश बनकर, अर्चना पाटील चाकूरकर, दयाशंकर तिवारी. अनंतराव देशमुख, गणेश हाके, नीता केळकर, राजेश पांडे, डॉ. आरती फुसाटे, अतुल काळसेकर, माधव भंडारी, माधवी नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली होती. त्या जागी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. महाराष्ट्र प्रदेशकडून तीन नावांबाबत आग्रह धरला जाऊ शकतो. तर, तीन नावे ही दिल्लीच्या पसंतीची असतील असे समजते. दरम्यान, संघटनेमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना संधी मिळणार असल्याची देखील चर्चा आहे.
येत्या चार-पाच दिवसांमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. उमेदवारांच्या निवडीत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो, अशी शक्यता काहीजण बोलून दाखवत आहेत. आता कुठल्याही मोठ्या निवडणूका नसल्याने सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा विचार न करता संघटनेसाठी काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी देखील भाजपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
मविआकडून उध्दव ठाकरे उमेदवार?
महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येत आहे. त्यातही ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार होण्यास फारसे उत्सुक नाहीत. मात्र, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच मविआचे उमेदवार असतील असे सांगितले जात आहे.





