नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात होण्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते (Road) आणि मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत. प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यासोबतच रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी विभागप्रमुखांना केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मंगळवारी (दि. ८) परिपत्रक जारी करून विविध विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या.
गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी आणि मिरवणुका (Processions) होणार असल्याने रस्त्यांवर पाणी साचणे, ड्रेनेजचे पाणी वाहून येणे किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी आयुक्तांनी विभागप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या एकाच खिडकीतून तातडीने देण्याच्या सूचना विभागीय अधिकारी तसेच जाहिरात व परवाना विभागाला करण्यात आल्या आहेत.
मिरवणूक मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विद्युत तारा व इतर केबल हटविणे, तसेच उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागांना देण्यात आली आहे. शहरात (City) कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’ निर्माण होऊ नयेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये दिवसातून दोन वेळा साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे, विविध ठिकाणी निर्माल्य कलश ठेवणे आणि गणेश विसर्जनासाठी विसर्जन कुंड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिक्रमण, फलकांवरही कारवाई
मुख्य रस्ते आणि बाजारपेठांतील रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नियमित मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनापरवाना फलक, होर्डिंग्ज आणि पताका हटविण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात रस्ते वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे.
पाणीपुरवठा आणि अग्निशमन यंत्रणा सतर्क
उत्सव काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक राहावा, तसेच दूषित पाण्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी दररोज पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमणे, पथदीप आणि इतर व्यवस्थेचा आढावा घ्यावा, असे आदेश आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन विभागाची यंत्रणा २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे नियोजन करण्यासही सांगण्यात आले आहे.




