नाशिक | Nashik
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर आज (सोमवारी) सुटला. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एक पत्रक काढून नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे.
दिल्लीत मांडवली करून पद पदरात पाडले
भाजपच्या (BJP) जल्लोषावर ताशेरे ओढत संजय राऊत म्हणाले की, “हे अत्यंत निर्लज्ज लोक आहेत. यांना पहिल्यांदाच पालकमंत्रिपद मिळाले आहे का? यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे. पालकमंत्रिपद हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, पण दोन जिल्ह्यांच्या वादासाठी दिल्लीत अमित शाह आणि पंतप्रधानांच्या दारी जावे लागले. मुंबईच्या भाषेत सांगायचे तर ही निव्वळ ‘मांडवली’ झाली आहे, असा घणाघात त्यांनी केला.
पुढे बोलताना राऊत यांनी नाशिकमधील (Nashik) समस्यांवर बोट ठेवले. ते म्हणाले, “आमचे वैयक्तिक भांडण कोणाशी नाही, पण गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि नागरी समस्यांवर लोकांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर द्या. खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना १ कोटी रुपयांची मदत मंजूर करून आणा. भ्रष्टाचाराला आता राजमान्यता मिळाली आहे,” असा आरोप राऊत यांनी केला.
पांडुरंग पावला – गिरीश महाजन
दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याचे समजताच मंत्री गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांना ही बातमी मिळाली. प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, “मला आज पांडुरंग पावला! मी मंदिरात दर्शन घेत असतानाच माझ्या पत्नीने हळूच कानात नाशिकच्या पालकमंत्रिपदाची बातमी सांगितली. १५ ते १६ हजार मतदारांसह पंढरपूरला आलेलो असताना ही आनंदाची बातमी मिळाली आहे. आता नाशिकचा महाकुंभमेळा ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य दिव्य होईल आणि नाशिक शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




