नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निफाडला (Niphad) उभारण्यात येत असलेल्या ड्रायपोर्टसाठी (Dryport) निफाड साखर कारखान्यापासून रेल्वेलाईनपर्यंत भूखंड अधिग्रहणाच्या हालचालींना वेग आला आहे. खासगी साडेआठ एकर क्षेत्राचे भूसंपादन व शेतकऱ्यांना (Farmer) द्यायच्या मोबदल्यावर अंतिम शिक्कामोर्तब येत्या आठवड्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष वाघ यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत घेतले जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारणीला आता गती मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या (Central Government) भारतमाला योजने अंतर्गत निफाड सहकारी साखर कारखान्याच्या १०८ एकरच्या जागेवर ड्रायपोर्ट व मल्टी मॉडेल हब उभारण्यात येणार आहे. जेएनपीटीमार्फत उभारण्यात येत असलेल्या ड्रायपोर्टसाठी पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जेएनपीटीने निफाड साखर कारखान्याच्या १०८ एकर जागेच्या मोबदल्यात १०५ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरीत केले होते. हा निधी जिल्हा प्रशासनाने बँकेकडे वर्ग करीत जमीन अधिग्रहण हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, या प्रकल्पाला जोडणीसाठी टाकण्यात येणाऱ्या रेल्वेलाईनसाठी साडेआठ हेक्टर खासगी क्षेत्राचे संपादन करणे शिल्लक असल्याने प्रक्रिया रखडलेली आहे.
त्याअनुषंगाने मंगळवारी (दि. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, माजी खासदार हेमंत गोडसे, निफाडच्या प्रांतधिकारी हेमांगी पाटील व जेएनपीटीचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते. ड्रायपोर्टच्या रेल्वेलाईनसाठी जमीन संपादित केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिकचा मोबदला मिळावा यासाठी आग्रह धरला आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून अद्यापही संपादनाचे दर अंतिम करण्यात आलेले नाहीत. त्यातच शेतकऱ्यांचा विरोध बघता मध्यंतरी सक्तीने भूसंपादनाचा मुद्दाही पुढे आला होता.
दरम्यान, या सर्व अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत (Meeting) चर्चा झाली. तसेच, पुढील आठवड्यात जेएनपीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीतच अंतिम दर निश्चितीचा निर्णय घेण्यावर एकमत झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, जेएनपीटीकडून निफाड साखर कारखान्याच्या जागेवर उभारायच्या ड्रायपोर्टसाठी पंधरा दिवसांपूर्वी ३६० कोटी रुपयांच्या आसपासची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.