
इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
दाढेगावजवळील (Dhadhegaon) वालदेवी नदीवरील (Waldevi River) पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह (Dead Body) अखेर चार दिवसांच्या शोधानंतर आज (मंगळवार दि.४ ऑगस्ट) रोजी सकाळी पुलाजवळील बंधाऱ्यालगत झाडाझुडपांमध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत युवकाचे नाव अभिषेक अनिल जाधव (वय २८, रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) असे आहे. मुसळधार पावसामुळे वालदेवी नदीला आलेल्या पुरात (Flood) शनिवार (दि.१) रोजी सायंकाळी पुलावरून जात असताना तो दुचाकीसह वाहून गेला होता. त्यानंतर अग्निशमन दल व एनडीआरएफच्या जवानांकडून सलग चार दिवस शोधमोहीम राबविण्यात आली होती; मात्र त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी पुलाजवळील बंधार्याकडे काही कुत्रे वारंवार जात असल्याचे दोन महिलांच्या निदर्शनास आले.
यावेळी संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता झाडाझुडपांमध्ये रेनकोट घातलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर संजय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. मृतदेहाजवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून संबंधित व्यक्तीची ओळख पटली.
त्यानंतर अभिषेकची बहीण पूजा आकाश पुजारी व मेहुणे सचिन अंतापूरकर यांना माहिती देण्यात आली. अभिषेकचे वडील यापूर्वीच मयत झाले असून तो आई शुभांगी जाधव यांच्यासोबत राहत होता. तो एबीपी कंपनीत कार्यरत होता. ड्युटी संपल्यानंतर याच मार्गाने घरी जात असताना ही दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकुलता एक मुलगा (Son) गमावल्याने आई शुभांगी जाधव यांनी घटनास्थळी मोठा आक्रोश केला.
दरम्यान, शोधमोहीमेत दाढेगाव व पिंपळगाव खांब येथील सोमनाथ बोराडे, समाधान जाधव, अंकुश भोर, सूरज सोनवणे, राहुल पालवे, मनोहर पालवे, किरण जाधव, सार्थक पालवे, अर्जुन भोर, सोन्या पवार, सूरज बेंडकोळी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच नगरसेवक भगवान दोंदे, सामाजिक कार्यकर्ते मदन ढेमसे आणि शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनीही शोधमोहीमेत सहभाग घेतला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी (Citizen) मोठी गर्दी केली होती.
आईला आर्थिक मदतीची मागणी
अभिषेक हा आईचा (Mother) एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. त्यामुळे शासन व महापालिकेने शुभांगी जाधव यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच आमदार सरोज अहिरे व पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.




