नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नववर्षात (New Year) शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आयुक्तालयाने केला आहे. विशेष म्हणजे, ‘स्मार्ट सिटी’च्या बारगळलेल्या कामांमुळे पोलीस (Police) स्वतः ‘सीएसआर’मधून शहरात आठशे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणार आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी सन २०२५मध्ये वाहतुकीसंदर्भातील कारवायांसह प्रबोधन व वाहतूक सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर यांनी पंचवटी, सरकारवाडा, नाशिकरोड व सातपूर या वाहतूक विभागांना त्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत. त्यामध्ये वाहतूक कोंडीच्या ठिकाणी संभाव्य उपाय, कारवाई, अवजड वाहतुकीचे नियोजन, सिप्रलची वेळ यासंदर्भातआवश्यक माहिती घेण्याचा समावेश आहे.
वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) पथकांकडून प्राप्त अहवालांनुसार शहरातील कोडी फोडण्यासाठी महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) व इतर संबंधित विभागांसोबत पोलीस चर्चा करणार आहेत. यापूर्वीही पोलिसांनी या स्वरुपाचा पुढाकार घेतला असला, तरी इतर यंत्रणांच्या दिरंगाईमुळे समस्येचे निवारण अद्याप झालेले नाही. त्यामुळे पोलिसांचा नववर्षाचा संकल्प इतर यंत्रणांसह सुज्ञ वाहन चालकांच्या साथीने पूर्ण व्हावा, ही नाशिककरांची अपेक्षा आहे. हरातील सर्व प्रमुख चौकांसह मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांचा संताप वाढत असल्याने पोलीस आयुक्तालयानेही या गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
सीसीटीव्हीसाठी ८० लाखांचा खर्च अपेक्षित
पोलिसांना गुन्हे नियंत्रणासह वाहतुकीचे ‘अपडेट’ घेण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाने नाशिकमधील काही संस्थांच्या ‘सीएसआर’ निधीतून शहरात आठशे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ७०-८० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जानेवारी २०२५ च्या अखेरपर्यंत त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
सहाशे कॅमेऱ्यांचा ‘फीड’ पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या सहाशे कॅमेऱ्यांचा ‘फीड’ पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपलब्ध आहे. परंतु, ई-चलान कारवाईसाठी ‘स्मार्ट सिटी’ने योग्य ती कार्यवाही केलेली नाही. पोलिसांना प्रशिक्षण दिले असले, तरी वायरिंगचे काम पूर्ण न झाल्याने बेशिस्त चालकांवर आपोआप ई-चलान ठोठविण्याची कारवाई पाच-सहा वर्षांपासून बारगळली आहे या सीसीटीव्हीमुळे पोलीस ठाणेनिहाय गुन्हे शोध, गर्दीच्या ठिकाणची माहिती, वाहतुकीसंदभर्भातील ‘अपडेट’ घेणे शक्य होईल.
नववर्षांत शहरातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भत ठोस कार्यवाहीचे पोलिसांचे प्रयत्न आहेत. महापालिकेनेही आता वाहनतळ निश्चितीसह रस्त्यातील अतिक्रमण दूर करण्यासंदर्भात तयारी दर्शवली आहे. पोलिसांनी सादर केलेला वाहतूक ‘वॉर्डन’ चा प्रस्तावही महापालिकेत प्रलंबित आहे.
संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त