नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपआपल्या परीने तयारी चालू केली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत निवडणुका युतीत आणि आघाडीत लढायच्या की स्वबळावर याची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे हे सर्व पक्ष निवडणुकीच्या (Eletion) वेळीच आपले पत्ते खोलण्याची शक्यता आहे.
अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुती (Mahayuti) एकत्र लढणार की स्वबळावर, याबाबत मोठे विधान केले आहे. मंत्री भुजबळ यांनी आज (शनिवार) दैनिक देशदूत (Deshdoot) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देशदूतच्या सहकार्यांशी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना एक वक्तव्य केले.
यावेळी भुजबळ म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढल्या पाहिजे. तसा एकत्र लढण्याचा प्रयत्न होईल. मात्र, शक्य न झाल्यास मैत्रीपूर्ण लढती होतील. प्रत्येक पक्षाला आपला गट वाढवायचा असतो. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते. त्यामुळे हा निर्णय वेळेवर घेतला जाईल”, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली अशा ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेची (Shinde Shivsena) ताकद जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदेंची शिवसेना महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार (Ajit Pawar) स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या वेळीच महायुती एकत्र लढणार की स्वबळावर? हे स्पष्ट होईल.





