नवी दिल्ली | New Delhi
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची चर्चा सुरू झाली असून, ‘ऑपरेशन टायगर’मुळे गेल्या तीन दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे काही खासदार (MP) सत्ताधारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असून, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने दिल्लीत दाखल झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार (Shivsena UBT MP) आज (बुधवारी) नवी दिल्लीत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे गटाचे किती खासदार या बैठकीला हजेरी लावणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदार हा आपला एक गट बनवून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या घडामोडींवर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मी सध्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये असून दिल्लीला जात आहे. उद्या होणार्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. तसेच मी ज्या पक्षाच्या तिकीटावर आणि निवडणूक चिन्हावर निवडून आलो आहे, त्या पक्षाशी आणि नेतृत्वांशी कधीही फारकत घेणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम आहे”, असे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी म्हटले.
शिंदे गटाच्या खासदाराच्या निवासस्थानी गुप्त बैठक?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या काही फुटीर खासदारांची दिल्लीत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी काल (मंगळवारी) रात्री गुप्त बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, दोन खासदारांच्या नकाराने या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक लागला होता. आता हा अडथळा दूर झाल्याची चर्चा असून ठाकरे गटाला पुन्हा मोठे खिंडार पडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.




