नवी दिल्ली | New Delhi
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची चर्चा सुरू झाली असून, ‘ऑपरेशन टायगर’मुळे गेल्या तीन दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे ९ पैकी काही खासदार काल सत्ताधारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने दिल्लीत दाखल झाल्याचे समजते.
हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : “आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता…”; संजय राऊत फुटीर खासदारांवर संतापले
यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांची (Shivsena UBT MP) आज (बुधवारी) नवी दिल्लीत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे गटाचे किती खासदार या बैठकीला हजेरी लावणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी आपला एक गट बनवून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना पत्र देत मान्यता देण्याची विनंती केली होती. त्यानंतर बिर्ला यांनी त्यांच्या गटाला मंजुरी दिली आहे. यानंतर आता नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या घडामोडींवर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मी सध्या दिल्लीत असून, उद्या होणार्या पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. तसेच मी ज्या पक्षाच्या तिकीटावर आणि निवडणूक चिन्हावर निवडून आलो आहे, त्या पक्षाशी आणि नेतृत्वांशी कधीही फारकत घेणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम आहे”, असे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Shivsena UBT Crisis : ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी! ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी; शिंदे सेनेत विलीन होणार
शिंदे गटाच्या खासदाराच्या निवासस्थानी गुप्त बैठक?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या काही फुटीर खासदारांची दिल्लीत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी काल (मंगळवारी) रात्री गुप्त बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, दोन खासदारांच्या नकाराने या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक लागला होता. आता हा अडथळा दूर झाल्याची चर्चा असून ठाकरे गटाला पुन्हा मोठे खिंडार पडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.




