नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमध्ये (Nashik) ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) यांनी रविवारच्या सभेत केली. नाशिकच्या भविष्यातील विकास व गुंतवणुकीच्या विविध योजना जाहीर केल्या. सिंहस्थ मेळ्याच्या आयोजनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभ हा केवळ उत्सव नसून आपल्या संस्कृतीचे दर्शन आहे. कितीही डाव्या नास्तिक लोकांनी टीका केली तरी सिंहस्थ कुंभ बंद पडणार नाही. गंगापूर धरणातून नवीन पाइपलाइन, ४७ टाक्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. गोदावरी स्वच्छतेसाठी पहिल्या टप्प्यात १ हजार कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात दीड हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज ठाकरे यांना गोदावरीत डुबकी आणि पिण्यास योग्य असे गोदावरीचे पाणी देऊ, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मलनिस्सारण प्रकल्पांसाठी गोदावरीतील (Godavari) जल प्रदुषण नाहीसे झाल्याशिवाय पैसे दिले जाणार नाही. नाशिकमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ४ हजार कॅमेरे बसवून तिसरा डोळा’ दिला जाणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांवर कडक नजर ठेवली जाईल. स्वतःची फायबर नेटवर्क उभारून शहर अधिक सुरक्षित केले जाईल. नाशिकमध्ये ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आतापर्यंत झाली आहे. जिंदाल, रिलायन्स, महिंद्रा, क्रॉम्प्टन यांसारख्या कंपन्यांची नावे त्यांनी घेतली. एचएएलमध्ये विमाननिर्मिती, एअरफोर्स प्रकल्प, एक हजार एकरवर नव्याने एमआयडीसी आणि एकूण ५० हजार कोटींची गुंतवणूक पाइपलाइनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : CM Devendra Fadnavis : नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध, सर्व भागांमध्ये पाणी देणार – मुख्यमंत्री फडणवीस
तसेच मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “मागील कुंभवेळी ६ हजार कोटींचा निधी होता, तर यावेळी तब्बल ३० हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. यामध्ये रिंगरोड, एसटीपी प्लांट, रामकालपथ, द्वारका व इंदिरानगर बोगदा यांचा समावेश आहे. असे त्यांनी म्हटले. प्रभू श्रीरामाच्या विचारांवर चालणारा भाजप पक्ष असून, नाशिक हे नाव शूर्पणखेचे नाक कापले गेले त्या घटनेवरून पडले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. नाशिकच्या (Nashik) विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांना छाटण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपले असताना महापौरही भाजपचाच असला पाहिजे”, अशी अपेक्षाही महाजन यांनी व्यक्त केली.
राज ठाकरेंनी उडवली होती महाजनांची खिल्ली
नाशिक येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलतांना मंत्री गिरीश महाजन यांचा ‘लाकूडतोड्या’ असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर यावर कालच्या (रविवार) सभेत बोलतांना महाजन यांनी “मी स्वतः २० हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करत आहे. तरीही केवळ टीआरपीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांना आता जाग आली, ते झाडाला मिठी मारून गेले. राज ठाकरे मला लाकूडतोड्या म्हणाले. मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. त्यांना बोलू द्या, ते मोठे नेते आहेत, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : बंडखोरांना भाजपचा दणका; माजी नगरसेवक मुकेश शहाणेंसह ‘यांची’ पक्षातून हकालपट्टी
हे तर पावसाळ्यातील बेडूक
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी आपल्या भाषणात बोलतांना “पावसाळ्यात बेडूक बाहेर पडून डराव डराव करतात, तसे निवडणुका आल्या की ठाकरे बंधू (Thackeray Brothers) सभा घेत फिरतात. त्यांच्या सभांना लोक गर्दी करतात, मात्र मतात रूपांतर होत नाही. तपोवनातील वृक्षतोडीवर रान माजवणे हा डाव्या विचारसरणीच्या लोकांचा डाव होता”, असा आरोपही त्यांनी केला.




