अंबासन | वार्ताहर | Ambasan
बागलाण तालुक्यात (Baglan Taluka) परतीच्या पावसाचा (Rain) तडाखा बसला आहे. मोसम व काटवन भागात भिंत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू (Death) झाला. तर शेतातील उभी असलेली पिके आडवी झाली आहेत. अनेक घराचे छप्पर उडाले असून, वीजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तर आमदार दिलीप बोरसे व तहसीलदार कैलास चावडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत.
शनिवारी (दि.२७) रोजी सायंकाळी वादळी वारा व मेघगर्जनेसह धुव्वाधार पाऊसाने तालुक्यातील अनेक गावांना झोडपून काढले. यापूर्वीच प्रशासनाने सतर्कतेचा इशाराही दिला होता. रात्री वादळी वारा व पावसामुळे गोराणे गावातील निर्मलाबाई नामदेव सोनवणे (वय ४३) व देवचंद गोपाळ सोनवणे (वय ९४) यांच्या घराची भिंत कोसळून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मौजे टेंभे खालचे येथे कस्तुराबाई भिका अहिरे (वय ६५) यांचा घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले होते.
तर टेंभे, आखतवाडे, गोराणे, मोराणे आदी गावांमध्ये शेतातील उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पोल्ट्री फार्म, घरांची पडझड झालेली आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) व तहसीलदार कैलास चावडे यांनी सकाळी मृत्यू झालेल्या कुटुंबियांची भेट देऊन सांत्वन केले व आवश्यक ती मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले.
तसेच पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) धरणक्षेत्रातील व नदीकाठावरील गावांना वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता शुभम चौधरी यांनी सांगितलेकी, सकाळी हरणबारी धरणातून १६४३ क्यूसेसने पुरपाणी मोसम नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आले होते. पाण्याचा जोर बघता पुन्हा काही तासांतच २५८८ क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आले. त्यानंतर तीन वाजेपर्यंत ३१२८ क्यूसेसने पुरपाणी मोसम नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आले. पुढेही पावसाचा जोर कायम राहीला तर पुरपाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेती पिकांचे नुकसान, मयत व्यक्तीची तसेच घरांचे पडझडीचे पंचनामे करून ते मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवले जाणार आहेत आणि येत्या दोन-तीन दिवस अधिक पावसाचा इशारा असल्यामुळे आवश्यकतेनुसार पिकाचे पंचनामे देखील करण्यात येणार आहे. नागरिकांनी जेष्ठ नागरिकांनी, लहान मुले यांची काळजी घ्यावी आणि धीर धरावा प्रशासन आपल्या सोबत आहे.
कैलास चावडे, तहसीलदार बागलाण




