नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यासह घाट प्रक्षेत्रात येत्या सोमवार दि. २०, २१ आणि २२ एप्रिल रोजी हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, या तीन दिवसांसाठी जिल्ह्याला (District) ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) देण्यात आला असून, नागरिकांना आणि विशेषतः शेतकरी वर्गाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडू शकतो. यावेळी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने शेतीकामांचे नियोजन करण्याचे सुचवले आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
हवामानातील या बदलाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, ‘इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट’ द्वारे पिकनिहाय सल्ला जारी करण्यात आला आहे. काढणीला आलेला उन्हाळी कांदा (Onion) आणि इतर पिके सुरक्षित स्थळी हलवावीत किंवा प्लास्टिक कागदाने झाकून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच फळबागांना आधार देऊन वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पशुपालकांसाठी खबरदारी
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी आपल्या जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात बांधावे. वीज चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर जनावरे उभी करू नयेत, असा इशाराही देण्यात आला आहे.




