नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पोलीस ठाण्याच्या (Police Station) पायऱ्या चढण्याची भीती आणि तक्रार नोंदवण्यासाठी होणारी पायपीट आता भूतकाळात जमा होत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत ‘एआय’ अस्त्र उपसले असून, ‘रक्षक एआय’ या चॅटबॉक्सने ग्रामीण महाराष्ट्रात सुरक्षेची नवी व्याख्या लिहिली आहे. तंत्रज्ञानाचा गंध नसलेल्या शेतकरी वर्गापासून ते सुशिक्षित तरुणांपर्यंत प्रत्येकासाठी हा ‘डिजिटल रक्षक’ २४ तास सज्ज आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा ‘डिजिटल डेस्क’ पारंपरिक पोलिसिंगचे संदर्भ बदलत आहे. तासनतास प्रवास करून पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी, आता केवळ एका ‘हाय’ मेसेजवर पोलिसांची मदत उपलब्ध होत आहे. हा ‘चॅटबॉक्स’ वकील नाही. दिलेली माहिती अचूक असेलच असे नाही. तसेच त्यावरील संवाद कायदेशीर पुरावा नसेल आणि त्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रक्षक एआयच्या प्रगतीचा ‘डेटा’
- १५ हजारांहून अधिक नागरिकांना थेट डिजिटल मदत.
- २ हजार ५०० पेक्षा जास्त गुन्हे आणि तक्रारींचा निपटारा.
- ५० पेक्षा जास्त दुर्गम गावांमधील नागरिकांचा सक्रिय सहभाग
हे असे करते काम?
- पोलिसांच्या अधिकृत चॅटबॉक्सवर ‘हाय’ मेसेज पाठवा.
- भाषा निवड : मराठी किंवा इंग्रजीपैकी एक भाषा निवडा.
- लोकेशन : तुमचे ‘लाईव्ह लोकेशन’ शेअर करा किंवा पोलीस ठाणे निवडा.
- पर्याय : तक्रार नोंदवणे, माहिती देणे किंवा नागरी सेवांची यादी समोर येईल.
- कार्यवाहीः तुमचा प्रश्न थेट यंत्रणेपर्यंत पोहोचून त्यावर काम सुरू.





