
दिंडोरी | Dindori
तालुक्यातील जोपुळ येथील एका आश्रमशाळेत एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरिदास अंबादास शेखरे असे मृत विद्यार्थ्याचे (Student) नाव असून तो इयत्ता दहावीत शिकत होता. एका विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकांनी त्याला कार्यालयात बोलावून चौकशी केली होती; यानंतर आलेल्या टोकाच्या मानसिक तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्याध्यापकांच्या चौकशीनंतर मानसिक तणावात
मिळालेल्या माहितीनुसार, हरिदासने एका विद्यार्थिनीला चिठ्ठी दिल्याची तक्रार प्रशासनाकडे गेली होती. यावरून त्याला गुरुवारी मुख्याध्यापक कार्यालयात बोलावून विचारणा करण्यात आली. या घटनेनंतर हरिदास प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. त्यानंतर काही वेळातच त्याने आश्रमशाळेच्या आवारातच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे शोक व्यक्त होत आहे.
पालकांचा संस्था प्रशासनावर रोष; सखोल चौकशीची मागणी
घटनेची माहिती मिळताच हरिदासच्या नातेवाइकांनी आणि पालकांनी (Parents) आश्रमशाळेत धाव घेत जोरदार निदर्शने केली. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या किंवा मुख्याध्यापकांच्या जाचक वर्तनामुळेच मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले का, असा सवाल उपस्थित करत पालकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी मध्यस्थी करत योग्य चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
वणी पोलिसांत नोंद; तपास सुरू
घटनेनंतर मृतदेह पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात (Pipalgaon Rural Hospital) नेऊन शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात (Vani Police Station) घटनेची नोंद करण्यात आली असून, हरिदासला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणारे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.




