
नाशिक | प्रतिनिधी
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणात नाशिक शहर पोलिसांनी विक्रमी वेळेत म्हणजेच ६५ दिवसांत तब्बल नऊ गुन्ह्यांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने ही कामगिरी केली आहे.
या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण ८ संशयितांवर ९ गुन्हे नोंद आहेत. देवळाली कॅम्प येथील गुन्ह्यात तब्बल १५०० पानांचे दोषारोपपत्र नाशिकरोड येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे, तर मुंबई नाका येथील गुन्ह्यांचे दोषारोपपत्र नाशिकमधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात गुरुवारी (दि. २८) सादर करण्यात आले आहेत असे एसआयटी प्रमूख तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांनी सांगितले..
पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार
या प्रकरणात संशयितांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात मुख्य दोषारोपपत्र दाखल झाले असले, तरी या गुन्ह्यांचा तपास भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९३ (९) प्रमाणे पुढे सुरूच राहणार असून, अधिकचे पुरावे प्राप्त करून न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
दोषारोपपत्र दाखल झालेले संशयित
१) रजा रफीक मेमन
२) शाहरूख हुसेन शौकत कुरेशी
३) अश्विनी अशोक चैनानी
४) तौसिफ बिलाल अत्तार
५) शफी भिकन शेख
६) दानिश इजाज शेख
७) निदा एजाज खान
८) आसिफ आलम अन्सारी




