मुंबई । प्रतिनिधी Mumbai
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना झालेल्या मारहाणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी शनिवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यासंदर्भात साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी जात असताना पत्रकारांना मारहाण झाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्रकारांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या मारहाणीची घटना समजताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.





